’विघ्नहर’कडून ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप   

बेल्हे, (वार्ताहर) : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा हंगाम १६७ दिवस सुरू राहिला. या काळात कारखान्याने ९ लाख ३ हजार ७११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापासून ९ लाख ९१ हजार १०१ साखर पोती उत्पादित झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
 
शेरकर म्हणाले, यंदा विघ्नहर कारखाना तब्बल १६७ दिवस चालला. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले तसेच आपल्या कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यामुळे १ लाख ४६ हजार मेट्रीक टन ऊस बाहेरच्या कारखान्याला देण्यात आला. कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे यंदा ऊसतोडणी काही प्रमाणात उशिरा झाल्यामुळे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना मनस्ताप झाला. मात्र कारखान्यावर असलेले प्रेम व आमच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी समजून घेत सहकार्य केले. पुढील वर्षी सर्व उसाचे गाळप वेळेवर होईल. कारखान्याकडे पुरेसा ऊस असला तरी गेटकेन ऊससुद्धा उपलब्ध केला जाईल.
 
कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, अभियंता बाळासाहेब शिंदे यांच्यासह चीफ केमिस्ट, सर्व कर्मचारी व ऊस तोडणी मजूर या सर्वांच्या सहकार्यामुळे गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, असेही ते म्हणाले.
 

Related Articles